साहित्याची पायवाट

मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमंत्रण पत्रिका






बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

devayani ----dasharath yadav poto

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौडेशनच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त ६ नोव्हेंबर रोजी वाशी (नवीमुंबई) येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात उद्योगपती पाटील यांचा ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार कवी दशरथ यादव यांच्या हस्ते उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी देवयानी फेम अभिनेत्री दिपाली पानसरे, डा. विश्वास मेंहदळे तमाशा कलावंत मंगला बनसोडे करवडीकर, सारंगी महाजन उपस्थित होते. — 



मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज
----------------
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला. बालपणीच दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथील धाराउ गाडे या मातेचे दूध देवून संभाजी राजांचे पोषण केले. क-हाकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्रि डोंगर रांगेवरील हिरवीगार औषधी वनस्पती गुणकारी आहे. पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळयांचा मुलासोबत शंभुराजांचे बालपण गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा व शौर्याने संभाजीराजांची राजकारण, साहित्य, समाजकारण याविषयीची दृष्टी अधिक दृढ होत गेली. राजकारणांचे डावपेच ते बालपणीच शिवरायांकडून शिकले. सुरवातीला त्यांची सावत्रआई सोयराबाई यांनीही खूप माया केली.
शंभुराजे देखणे व शूर होते. राजकारणातील बारकावे भराभर शिकून घेतले. मोगल दरबारातील घडामोडी व राजकारण त्यांना लहान वयात कळाले. वयाच्या ९ व्या वर्षीच शिवरायांनी त्यांना जाणीपूर्वक आग्रा येथे आरंगाजेबाच्या भेटीवेळी नेले होते. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदैतून निसटल्यानंतर संभाजीराजांना तेथेच ठेवून ते निघाले. मोरोपंत पेशव्याचे मेहुणे तेथील होते, त्यांच्या घरी त्यांना ठेवले. मोगली सैनि्कांचा ससेमिरा थांबविण्यासाठी संभाजीराजांच्या निधनाची अफवाही त्यांनी सोडली. स्वराज्यात शिवराय आल्यानंतर काही काळाने शंभुराजे पोचले.
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तोपर्य़ंत संभाजीराजे बारकावे व रणांगणातील डावपेचात तरबेज झाले होते. त्यांनी राज्याभिषेकासाठी आलेल्यांना नम्र स्वभावाने जिंकून घेतले. राज्यभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी राजमाता जिजाऊंचे निधन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे झाले. शिवाजीराजे राजकारण व रणांगणावर गुंतले होते. शंभुराजाकडे लक्ष कोण देणार..त्यांचे शिवरायांच्या दरबारातील अनुभवी मानक-यांशी अनेकदा मतभेद होउ लागले. अमात्य अणणाजी दतो यांच्या कारभाराला शंभुराजाचा सक्त विरोध होता. शिवाजीमहाराजांनी अण्णाजी हे कुशलप्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ठकारभाराकडे दुर्लक्ष केले होते. पण संभाजीराजांना ते मान्य होण्यासारखे नव्हते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले. असे उद्घार काढल्याने ते व मानकरी शंभुराजांवर नाराज होते. सोयराबाई व अण्णाजी दतो यांच्या विरोधामुळे शिवाजी राजांना दक्षिण हिंदूस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. शिवाजीराजांच्या अनुपस्थित संभाजीराजांचा हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळ नकार देत. त्यामुळे महाराजांना कोकणातील शृंगारपुरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना तिकडे पाठवावे लागले.

शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत, राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.

साहित्यिक संभाजीराजे

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे:

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।

जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास

तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "




मोगल सरदार

अष्टप्रधान मंडळाच्या या प्रवृतीमुळे व्यथित होऊन शंभुराजांनी औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांनतर  दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळेने किल्ला नेटाने लढवला. शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत, हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. दिलेरखानाने जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.

संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकऱ्यांमधील दरी अजूनच रुंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामाच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामाच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.

सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे गादीचे हक्काचे वारसदार होते. शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला. अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते.

अण्णाजी दतो मारला
१६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

प्रधान मंडळ

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले )

श्री सखी राज्ञी जयति - छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

सरसेनापती - हंबीरराव मोहिते
कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) - कवी कलश (कलुषा)
पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
चिटणीस - बाळाजी आवजी
सुरनीस - आबाजी सोनदेव
डबीर - जनार्दनपंत
मुजुमदार - अण्णाजी दत्तो
वाकेनवीस - दत्ताजीपंत


औरंगजेबाची दख्खन मोहीम

औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते. त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती, की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की, तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.


दगाफटका
इ.स. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

त्यानंतर संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले.  औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक धिंड काढली.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती.  पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. तुळापूरच्या संगमावर हाल करुन त्यांची हत्या केली.
बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. .
राजांची हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे करण्यात आली.


शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते. त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यामुळे देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा, तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि, ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ, पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत.  
औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते, जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते, ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं. तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं. त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता. तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत. हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे.

युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता, श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती. कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते. शिवाजी महाराज पन्हाळा, सातारा, महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले.
हिंदवी स्वराज्य ५ मोठ्या शत्रूंच्या तावडीत सापडले असताना धडाडीने, ज्याने तडफेने ह्या सर्वाना तोंड दिले असा हा स्वराज्याचा दुसरा छत्रपती. शिवधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
संभाजी महाराजांच्या जीवावर उठलेला औरंगझेब ५ लाख फौज घेऊन मराठ्यांना संपवण्यासाठी दक्षिणेत उतरला. त्याला धीराने तोंड देताना, गोवेकर पोर्तुगीज, इंग्रज, जंजिरेकर सिद्दी, तसेच फंदफितुरीने बरबटलेले घरातलेच स्वकीय शत्रू ह्या सर्वाना समर्थपणे तोंड देता देता मृत्यूलाही कवटाळले. त्यांच्या पराक्रमाने आणि निर्भयपणे स्वीकारलेल्या मृत्यूमुळे निदरिस्त झालेल्या मराठ्यांत नवचैतन्य उसळल आणि औरंगझेब महाराष्ट्रातच गाडला गेला. पुढे याच मराठी अश्वपथकानी थेट दिल्ली वर धडक देऊन उत्तरेत आपली सत्ता स्थापन केली. हे शक्य झाला केवळ शंभू राजांच्या बलिदानामुळेच.




शाईस्तेखानचा पराभव, पुरंदरचा तह, औरंगजेब यांची भेट, आग्र्याहून शिवाजी महाराजांनी केलेले पलायन, यातून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. संभाजी राजांना पाच हजारी मनसब, पाच हजार स्वार, ज्यांची दोन घोडी असावीत, त्याप्रमाणे देऊन पोशाख आणि पंजाच्या शिक्क्यासह हा फर्मान पाठवला आहे. संभाजी राजे वयाच्या आठव्या वर्षीच मुगल मनसबदार झाले.  शिवाजी महाराजांनी औरंगजेबास विरोध दर्शवला त्याची दखल संपूर्ण भारताने घेतली, ह्या घटनेचे साक्षीदार संभाजी राजे होते.  ह्याच औरंगजेबासोबत शिवाजी महाराजांच्या कैलासवासानंतर सतत ९ वर्षे लढा संभाजीराजांनी दिला.


 
भूपाळगड

 ११ मे १६७८ रोजी शिवाजी महाराज स्वराज्यात परतले (जे.श). शृंगारपुरमधे घडलेल्या सर्व हकीकती महाराजांना हेरांकरवी समजल्या. याच दरम्यान ४ महिन्याचा कालावधी गेला आणि येसूबाई यांना कन्यारत्न प्राप्त झाले, दिवस होता ४ सप्टें १६७८. त्यांचे नाव भवानीबाई ठेवण्यात आले कवी कलश शंभू राजांचा कंठ कौस्तुभ बनला होता.कागदपत्रे वाचताना एक गोष्ट स्पष्ट समजते की कवी कलश शंभूराजांशिवाय इतर कुणालाही प्रिय नव्हता. किंबहुना रायगडावर तो केवळ शंभू छत्रपतींमुळेच टिकून होता.








शिवाजी महाराजांनी मोहीम हाती घेतली होती ती तळ कोकणाची. शिर्के हे महाराष्ट्रातील फार प्राचीन घराणे, त्यावेळी शिर्क्यांकडे दाभोळचे वतन होते. तळकोकण स्वारीत जसवंतरावच्या पालीवर कब्जा झाल्यावर महाराजांनी लगोलग दाभोळ देखील काबीज केले आणि शिर्क्यांचे दाभोळचे वतन स्वराज्यात अनामत करून त्यांना स्वराज्य सेवेत रुजू करून घेतले. यानंतर २९ एप्रील १६६१ मधे महाराजांनी सूर्यराव सुर्वे यांचे शृंगारपुर ताब्यात घेऊन सर्व वतनदारांचा असणारा अंमल हा संपुष्टात आणला. महाराजांनी यावेळी एक निर्णय घेतला व पिलाजीराव शिर्के यांच्याशी सोयरिक केली. आपली एक मुलगी राजकुंवरबाईसाहेब आणि  पिलाजीरावांचा मुलगा गणोजी शिर्के यांचा विवाह करून दिला, हेच नाते अधिकच दृढ करण्याहेतूने महाराजांनी पिलाजीरावांची मुलगी जिऊबाई (येसूबाईसाहेब) आणि संभाजीराजे यांचा देखील विवाह केला.
समकालीन फारसी साहित्यामध्ये भोसले – शिर्के वितुष्टाचे उल्लेख आढळतात.
१) मुकर्रबखान याने संभाजीची बातमी आणण्यासाठी स्वताचे हेर नेमले होते, एकाएकी त्याला बातमी लागली की संभाजी राजे आणि त्याचे आप्त असणारी शिर्के मंडळी यांचे भांडण झाले. (मा.आ)
२) कवी कलश हा फजित पावून खेळण्यास दडून बसला हे पाहून संभाजीने आप्तेष्टांना कैद केले, भयंकर छळ होऊ लागला. फु.आ)

कवी कलशाच्या या नसत्या उठाठेविमुळे स्वराज्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली. भोसले – शिर्के हे संबध तर बिघडले.मुकर्रबखानाने शंभूराजांना पकडले आणि अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली.
ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.
इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली

टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही. तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.
याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.

रामदास स्वामीचा शिष्य रंगास्वामीने महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले,
याच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच.


अन महारानी संभाजी महाराजांचा अंतिम विधी केला.
संभाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे मराठी साहित्यिकांची मेजवानी. त्यावर कित्येक मराठी साहित्यिकानी विस्तॄत लिखान केलं. त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगानीतर उभा महाराष्ट्र थरथरतो असे लिहान साहित्यिकानी उतरवून ठेवले. यातील खरं किती खोटं किती माहीत नाही. पण औरंगजेबानी त्यांचे हाल हाल करुन अत्य़ंत क्रूरपणे जीव घेतला हे सर्वमान्य आहे. यावरुन काहिनी त्याना चक्क धर्मवीर ठरवून टाकले तर काहिनी मृत्य़ूशी लढणारा वीर. एकंदरीत संभाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा, धोरनात्मक वृत्ती अन लहान वयातच लिलया पेलणारं सेनापती पद या सर्व गोष्टींपेक्षा सर्वात जास्त चर्चेत राहिलेली गोष्ट कुठली तर त्यांचं मृत्यू. याला कारणीभूत कोण तर या मृत्य़ूला रंगविणारे  लेखक-कादंबरीकार. ते औरंगजेबाच्या पुढे पेश केल्या नंतर कसे स्वाभिमानाने बोलले, मग औरंग्यानी त्याना कसे मारले या सर्व गोष्टी ईतक्या ईतक्या रंगविण्यात आल्या की मराठी मातीतील शेंबडया पोरालाही संभाजीचा मृत्यू माहित आहे. पण हे सर्व करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट जाणिवपूर्व अनफोकस ठेवण्यात आली.
ती म्हणजे संभाजीच्या मृत्यू नंतर त्यांची उत्तरक्रिया महार समाजानी केली. संभाजी व कवी कलशची समाधी वढू गावातील महार वाड्याला लागून आहे. औरंग्याच्या दहशतीला न जुमानता आपल्या प्रिय राजाचा अंतिम संस्कार पार पाडणा-या धीरोदात्त अशा महार समाजाचं कर्तूत्व मोठे आहे.
मनुस्मृतीनुसार राजांची हत्या पंडितानी केली.  त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करुन वढू गावाच्या शेजारी फेकण्यात आले. त्या नंतर अशी दवंडी पिटण्यात येते की जो कोणी संभाजी वा त्याच्या गुरुची अंतिम क्रिया करेल त्याची धडगत होणार नाही. औरंग्याच्या या धमकीला गावकरी घाबरतात.   संभाजी व कवी कलशाचा अंतीम विधी गावक-यानी व मराठ्यानी केला असता तर त्यांची समाधी ईतर कुठेही असती पण ती आहे चक्क महारवड्याला लागून.
वीर महारांचा धाडसीपणा
संभाजीच्या शरीराच्या तुकड्यांची दशा पाहून एक समाज खवळून उठतो. औरंगजेबाच्या धमक्याना न जूमानता थेट घराच्या बाहेर पडतो व आपला प्रिय राजा संभाजीच्या शरिराचे तुकडे गोळा करतो. हिंदुस्थानच्या शहंशाहच्या विरोधात जाऊन महाराजांची अंतीमक्रिया करण्याचं अस धाडसं दाखविणारा समाज दुसरा तीसरा कुणी नसून निधड्या छातीचा माझा महार समाज होता. संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्यात येतात. त्याच बरोबर कवी कलशाचेही तुकडे गोळा करण्यात येतात. वढू गाव अत्यंत दहशतीखाली जगत असताना असं धाडस करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. पण महारांची शूरता काय असते ते आजून औरंग्याला माहित नव्हतं. महार जेंव्हा पेटून उठतो तेंव्हा वादळ स्वत:ची दिशा बदलतो. याचे इतिहासातील कित्येक पुरावे जरी सनातन्यानी लपविले तरी ते अधून मधून डोकावतातच. महारानी अत्यंत नियोजनपुर्वक कामगिरी पार पाडण्याचे ठरविले. शरीराचे तुकडे गोळा करण्यासाठी घराबाहेर पडताना महारानी तृतीयपंथीयाचा वेष धारण केला. महार जात मुळात विविध कला गुणानी संपन्न होतीच. पण या कलेचा वेळ प्रसंगी देशासाठी वापर करण्याचा निधडेपणाही माझ्या बांधवांच्या ठायी होता. .




दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१









जेजुरीचा खंडोबा

जेजुरीचा खंडोबा

----------------
मा. दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१
-----------
जेजुरीचा खंडोबा व पंढरीचा विठोबा हे महाराष्ट्राचे लोकदेव आहेत. मराठी माणसांच्या मनामनात दोन्ही देवांबाबत तितकीत आपुलकी आहे. पुरंदर तालुक्यात पुण्यापासून सुमारे तीस मैल अंतरावर जेजुरी येथे खंडोबाचे देवस्थान आहे. धनगर, कोळी, मराठा, व इतर अनेकांचे हे आराध्यदैवत आहे.
इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले. सभोवतालच्या ओव-या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात आहे. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.
गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पाय-या, दीपमाळा, कमानी उभारल्या आहेत. बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची कल्पना येते.

जेजुरीचे शिखर व समोरच्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता.  देवळाच्या ओव-या ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.
देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळि भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.
खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला.

खंडोबाची यात्रा व जत्रा ः खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळि भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वर्‍हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो.

खंडोबाची स्थाने
--------------
जेजुरी (पुणे), पाली (सातारा), मंगसुळी (बेळगाव), देवरगुड्डा (राणीबेन्नूर), मैलार लिंगप्पा (खानापूर), बेल्लारी), मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा), आदि मैलार (बीदर), अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद), माळेगाव (नांदेड), सातारे (औरंगाबाद), शेगुड (अहमदनगर) व निमगाव धावडी (पुणे).
खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र ; चतुर्भुज; कपाळाला भंडारा असे रूप असते. खंडोबाचे मुळ पीठ जेजुरी आहे.
खंडोबा हे नाव देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग > मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद > स्कंदोबा > खंडोबा) याखेरीज मल्हारी (मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे एक कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.
कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
खंडोबा म्हाळसा मणिमल्लांचा संहार करताना (मूळ शिळाचित्राचे साल - १८८०)
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही. मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे, असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी > नळदुर्ग > पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा.
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले. खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रिविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.
महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मा्र्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे. जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती. मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला.
कुळाचार - दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.
जागरण - गोंधळ : देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
तळी भरणे : तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा ,सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा.
बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्त्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. याशिवाय रगडा, भरीत आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात. खंडोबाचे उपासक ब्राह्मणांपासून लिंगायत, धनगर, मराठा अशा सर्व जातींमध्ये आढळतात.


मल्हारी महात्म्य.

संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्त्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० - १७४० च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे. खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आहेत.
एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.
खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. तिसऱ्या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने तेलीण आहे तर पाचवी चांदाई मुस्लिम आहे. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संपप्त झाली. तेव्हा बायकांचा झगडा थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.

दंतकथा
सावकारी भुंगा : औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने माळशिरसचा दौलतमंगल किल्ला काबीज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले, असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढविला. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृतांत सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रुपये खंडोबास नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हणतात.
भाया भक्ताची साक्ष : एकदा कडेपठारावर धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंगाची प्रार्थना सुरू केली. वडिलधार्यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले तेव्हा लिंगाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडील माणसेव विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला. तेव्हा ज्या कोणाची कुऱ्हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कुऱ्हाड रुतली आणि त्यातून रक्तदुधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला असता वरील कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती.
जेजुरी : वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. हे उत्सव देवाची विधिपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्रा उत्सवांचे स्वरूप असते. सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम आणि इंदूरच्या होळकरांना पालखीचा मान असतो. डफ, मर्फा, सनई, ताशा आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. जेजुरीगडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे पौष यात्रेचे आकर्षण आहे.